पुणे : ‘लेखन आणि साहित्यनिर्मिती ही एक सृजनात्मक प्रक्रिया आहे. लेखक जोपर्यंत अंतर्बाह्य ढवळून निघत नाही, विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात नाही, वेगवेगळ्या जाणिवांची, अनुभवांची बेरीज करीत नाही तोपर्यंत सकस साहित्यकृती निर्माण होणार नाहीत. लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखनविषयक कार्यशाळा उपयुक्त आहेत,’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) आणि साहित्य सेतू यांनी आयोजित केलेल्या लेखन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर ‘मसाप’चे कार्यवाह प्रमोद आडकर, साहित्य सेतूचे प्रा. क्षितिज पाटुकले आणि सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर उपस्थित होते.
डॉ. जोशी म्हणाले, ‘जागतिकीकरणांमुळे संपूर्ण जगात एकच भाषा, एकच जीवनपद्धती, एकाच प्रकारचे साहित्य आणि त्यातून संपूर्ण जग म्हणजे एकच बाजारपेठ निर्माण करणे असा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे स्थानिक निर्मिती क्षमता, प्रादेशिक परंपरा, साहित्य, लोककला लयाला जाणार आहेत. अशा वेळी नवीन लेखकांसाठी फार मोठे आव्हान आणि तितक्याच संधी निर्माण झाल्या आहेत.’
वेलणकर यांनी नवोदीत लेखकांनी तंत्रज्ञानाचा आणि ऑनलाइन पुस्तक वितरण व्यवस्थांचा लाभ घेऊन व्यावसायिक लेखक बनण्याचा सल्ला दिला.
या कार्यशाळेमध्ये प्रा. पाटुकले यांनी छापील पुस्तक, ई-बुक, अॅमेझॉन किंडल बुक, ऑडिओ बुक निर्मिती प्रक्रिया, ऑनलाइन पुस्तक वितरण यावर, अॅड. कल्याणी पाठक यांनी एकाच पुस्तकाचे विविध प्रकारचे कॉपीराइट्स, त्यांचा आवाका आणि अधिकार यांविषयी आणि भालचंद्र कुलकर्णी यांनी आयएसबीएन, ऑनलाइन पोर्टल नोंदणी, नियतकालिकांची नोंदणी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेसाठी संपूर्ण राज्यातून नवोदित लेखक उपस्थित होते. प्रा. अनिकेत पाटील यांनी आभार मानले.